Wikipedia

Search results

Thursday, 26 September 2013

डॉ. नरेंद्र दाभोलकर

  • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे परखड विचार-
दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना अनेकांनी अकलेचे तारे तोडले.[६]- आसारामबापू आणि अनिरुद्धबापू यांनी तर कहरच केला. बलात्कारित तरुणीने सरस्वती मंत्राचा जप केला असता तर बलात्कार झालाच नसता, मी दिलेल्या एका विशिष्ट मंत्रामुळे बलात्कारी नपुंसक होतील अशी या बुवाबापूंची विधाने म्हणजे निव्वळ भोंदूगिरीच नाही तर समाजाची दिशाभूल आहे. दिल्लीतील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूने सारा देश व्यथित झाला. संताप उसळला. पुन्हा असे घडू नये यासाठी अनेक उपाय सर्व समाजघटकांतून व स्तरांतून पुढे आले. मग कथित आध्यात्मिक गुरू तरी मागे कसे राहणार? आसारामबापू व अनिरुद्धबापू या दोघांनी सुचवलेले उपाय सर्वत्र गाजले. आसारामबापूंच्या मते घरी सरस्वती स्तोत्र म्हणून जर ती तरुणी बाहेर पडली असती, तर तिच्यावर बलात्कार होऊच शकला नसता. अत्याचार करणाऱ्यांपैकी काही जणांना तुम्ही माझे भाऊ आहात, मला वाचवा, अशी मनधरणी तिने करावयास हवी होती. अनिरुद्धबापूंचे म्हणणे असे की, जर स्त्रीने ‘अनिरुद्ध चालीसा’ रोज १०८ वेळा असे अकरा दिवस म्हटले तर बलात्काराचा प्रयत्न करणारी व्यक्ती आपोआप नपुंसक होईल व तसे सर्वाना कळेल. मुळात ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्र’ मंत्राचा जप केला तर बलात्कार होऊच शकणार नाही. शिवाय त्यांच्या चंडिका गटाच्या व अहिल्या संघाच्या महिलांना ते असे टेक्निक शिकवणार आहेत की, बलात्कार करणाऱ्याला त्या नपुंसक करतील. आसारामबापूंनी याही पुढे जाऊन एका हाताने टाळी वाजत नाही, असेही तारे तोडले. याबाबत टीका करणाऱ्या माध्यमांना त्यांनी भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली.
ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेली असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमाहात्म्य वाढवणाऱ्या तंत्राची असते.
प्रश्न या कथित आध्यात्मिक गुरूंच्या बरळण्याचा नाही, तर आज अशा स्वयंघोषित बाबा, बापू, स्वामी, भगवान, महाराज यांची जी साम्राज्ये उभी राहिली आहेत आणि त्यांना लक्षावधीचा अनुयायी वर्ग लाभत आहे, त्या सामाजिक मानसिकतेच्या व व्यवस्थेचा शोध घेण्याचा आहे. विशेषत: साडेतीनशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराज म्हणाले,
‘ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करूनि या म्हणती साधू। अंगा लावूनिया राख। डोळे झाकून करती पाप।। दावूनी वैराग्याचा कला। भोगी विषयाचा सोहळा।। तुका म्हणे सांगू किती। जळो तयाची संगती।।
असे परखड बोल ऐकणाऱ्या समाजात आज ‘जळो तयाची संगती याऐवजी ‘मिळो तयाची संगती’ अशी अवस्था का आली याचा शोध घ्यावयास हवा.[६]
आसारामबापू निखालस अवैज्ञानिक असामाजिक विधाने करून समाजाला संकटाच्या मार्गाकडे ढकलत आहेत. हा आजचा मामला नाही. त्यांच्यातर्फे मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या ‘ऋषिप्रसाद’ या मासिकातील पान क्र. १२ वरील हा मजकूर पाहा- ‘एका भोजपत्रावर’ ‘टं’ लिहून उजव्या दंडावरील ताईतामध्ये बांधल्यास तो ताईत सर्व विघ्ननाशकांच्या रूपात काम करतो. कॅल्शियमची कमतरता, स्त्रियांमधील दुधाची कमतरता, नवजात बालकाचे जास्त रडणे यासाठी कागदावर हा ‘टं’ लिहून गळ्यात ताईताप्रमाणे बांधल्यास मुलाचे रडणे, किंचाळणे शांत होते. मंत्र जप महिमा (हिंदू पा. क्र. ३५) यातील इलाज पाहा- ‘सात वेळा हरी ॐ चा उच्चार केल्याने मूलाधार केंद्रात स्पंदने होतात. कित्येक रोगांचे किटाणू पळून जातात. प्रा. गटेचे म्हणणे आहे की, जर एक तासपर्यंत क्रोध करणाऱ्या व्यक्तीच्या विषारी श्वासाचे कण एकत्रित करून इंजेक्शन तयार केले, तर त्याने २० लोक मरू शकतात.’ अनिरुद्धबापूंच्या दरबाराच्या रांगेत उभे राहिले की, जितक्या इच्छापूर्तीची अपेक्षा असेल तितक्या सुपाऱ्या हातात घ्यायच्या. बापूंनी तपश्चर्येने त्या सिद्ध केलेल्या असल्यामुळे तुमचे काम होतेच; शिवाय ‘अनिरुद्ध उपासना ट्रस्ट’च्या प्रकाशनात संकट येण्यापूर्वीच बापू त्या ठिकाणी कसे हजर होतात, ते भक्तांना कधी श्रीकृष्ण, कधी राम, कधी विठोबा यांच्या रूपात कसे दर्शन देतात, ते भक्ताचा पूर्वजन्म आणि पुनर्जन्म कसा जाणतात याची रसभरित वर्णने आढळतात.
प्रत्यक्षात ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेली असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमाहात्म्य वाढवणाऱ्या तंत्राची असते. बाबांच्या भक्तांचे विशिष्ट रंगाचे कपडे, विशिष्ट माळा, महाराजांचा फोटो असलेला बिल्ला, पेन, मंत्रजप या साऱ्यांतून एक प्रभावी वातावरणनिर्मिती होते.
काही वर्षांपूर्वी आसारामबापूंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते- ‘ज्याप्रमाणे आपण चांगली शाळा, चांगला शिक्षक, चांगला डॉक्टर शोधतो त्याप्रमाणेच प्रत्येकाने चांगला गुरूही शोधावा. गुरू हा शिष्याचा सर्व संशय मुळापासून उखडून काढतो, भीती घालवतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याला वाचवतो. त्याच्या दर्शनाने वासना, विकार गळून पडतात व अक्षय आनंदाचा ठेवा मिळतो. आपल्या भक्ताचे दु:ख ध्यान, मंत्र असे आध्यात्मिक मार्ग, सत्संग व गुरूभोवतालचे दैवी वलय आणि स्पंदने याद्वारे गुरू बरा करतो.’
गुरूच्या पायावर आपली बुद्धी गहाण ठेवल्याशिवाय अशी गुरुभक्ती सुचणे अवघड आहे; परंतु ज्या वेगाने आज बाबा-बुवा, गुरू, सद्गुरू, स्वामी, महाराज यांचे पीक वाढते आहे ते लक्षात घेता ही मानसिकताच जनमानसावर प्रत्यक्ष अधिकार गाजवते आहे असे दिसते. उपचार, चमत्कार करणारे वा न करणारे बाबा अथवा महाराज हे सर्व परमार्थ, ईश्वरशक्ती, ईश्वरप्राप्ती, ब्रह्मज्ञान या नावानेच करत असतात. त्यांची खरी ताकद फसवणूक करण्याच्या कसबात नसते, तर लोकमानसात कथित परमार्थाबद्दल परंपरेतून आलेली जी विलक्षण मान्यता आहे त्यामध्ये असते.
बाबांचे विचार, पारायणे, गुरुभक्ती यातच भक्ताला जीवनाचा आधार व कृतार्थता वाटते. त्यामधून मग अव्वल दर्जाची मानसिक गुलामगिरी निर्माण होते.[६] बाबा ती मोठय़ा खुषीने आपणाशी जोडतात. ही ‘परमार्थ मार्गातील लुच्चेगिरी’ आहे.[७] म्हणूनच बुवाबाजीची व्याख्या ‘जो व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या दु:खांची कारणे व त्यावरील उपाय विवेकवादी विचाराशी विसंगत अशा दैवासारख्या भ्रामक कल्पना, अन्याय रूढी, पुराणमतवादी कल्पना व परंपरा यांच्या आधारे व त्यांचे समर्थन करत सांगतो, प्रश्न सोडवण्याचा चुकीचा अवैज्ञानिक मार्ग दाखवतो व सर्वागाने फसवणूक व शोषणच करतो तो म्हणजे बुवा व त्याची कार्यप्रणाली म्हणजे बुवाबाजी अशी करता येईल. बुवाच्या नादी लागणे, निदान त्याचा अनुग्रह घेणे ही आजच्या काळातील रूढी होऊ लागली काय असे हल्ली जाणवते, अन्यथा सुशीलकुमार शिंदेसारख्यांनी मुख्यमंत्री असताना नाणीजच्या नरेंद्र महाराजांची भेट घेऊन त्यांना स्वामी विवेकानंदांची उपमा दिली नसती. व्यक्तीला व्यावहारिक व राजकीय मोठेपणाबरोबर धार्मिक मोठेपणाही पाहिजे असतो. मग धार्मिक म्हणवून घेण्याचा राजमार्ग म्हणजे महाराजांचे दर्शन, अनुग्रह घेणे. अर्थात या आचरणात अज्ञान, अनुकरण, बुद्धिदौर्बल्य व धार्मिक म्हणवून घेण्याची इच्छा सर्वकाळी असते. आपल्याकडील पारंपरिक धार्मिक विचार, अवतार कल्पना यामुळे ईश्वरी वचन बाबांच्या मुखातून आपणापर्यंत पोचते आणि आपले परमकल्याण करते, असे भक्ताला वाटत असते. गुरूला समर्पित होणे, ही त्याच्या लेखी बुद्धीची शरणागती नव्हे, तर आनंदाची अनुभूती असते. स्वतंत्र बुद्धीने विचार करून त्यासाठी संघर्ष करणे या बाबी भक्तगणांना क्षुल्लक वाटतात. बाबांचे विचार, पारायणे, गुरुभक्ती यातच जीवनाचा आधार व कृतार्थता वाटते. त्यामधून मग अव्वल दर्जाची मानसिक गुलामगिरी निर्माण होते.
बाबांचा शब्द हे 'ब्रह्मवाक्य' व नैतिकता असते. विरोधी ‘ब्र’ उच्चारणाऱ्याला धमकावण्यापासून ते ठोकण्यापर्यंत सर्व मार्ग वापरले जातात. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्यांचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही घेतलेली असते. अट एकच असते, स्वत:ची बुद्धी वापरावयाची नाही.
बुवाबाजीचे पीक या भूमीत भरघोस येण्याचे कारण या देशाच्या मनोभूमीची मशागत नियती, विधिलिखित, दैव, नशीब, प्रारब्ध या कल्पनांनी केली आहे. या सर्व शब्दांचे अर्थ काहीसे भिन्न आहेत, परंतु बुवाबाजीचे पीक येण्यासाठी त्यामुळे काही फरक पडत नाही. अगदी आजही चांगली घटना सुदैव व वाईट घटना कमनशीब मानले जाते. सोसाव्या लागणाऱ्या अन्याय, अत्याचार, दु:ख यांना नियतीचा अटळ तडाखा म्हणून बघितले जाते. चांगल्या वर्तनाला आज ना उद्या चांगलेच फळ येणार आणि वाईट कर्माचे तसेच परिणाम संबंधितांना कधी तरी सोसावे लागणारच, हा निष्कर्ष सदिच्छेवर आधारित आहे, सत्यावर नाही. समाजस्थापनेचा प्रवास खूप प्रदीर्घ आहे. मानवाची निर्मिती असलेला न्याय अवघ्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच निर्माण झाला आणि आजही न्याय फारच थोड्या प्रमाणात प्रत्यक्षात येतो. कर्मसिद्धांताच्या बाजूने केले जाणारे सर्व युक्तिवाद अतिशय दुर्बल व गैरलागू आहेत.[८] मात्र कर्मसिद्धान्त हे भारतीय तत्त्वज्ञानाचे एक वैशिष्ट्य आहे. तो विश्वाचा नियम मानला आहे. अपवादात्मक दर्शन वगळता सर्व भारतीय दर्शनांनी कर्मसिद्धान्त स्वीकारला आहे. यामुळेच नियतीची दृढ कल्पना या देशातील बहुसंख्य लोक मानतात व या काल्पनिक गोष्टींच्या आहारी जाऊन आणखी भयभीत बनतात. कर्मविपाकाला सत्य मानून आज होणारे त्यांचे शोषण प्रारब्ध होते, अशी स्वत:च्या मनाची ते समजूत करून घेतात. पूर्वसंचितावर अवलंबून असलेल्या प्रारब्धातून सुटका होणे अवघडच, पण गुरूंच्या, बाबांच्या कृपाप्रसादाने ते शक्य आहे असे मानले जाते, कारण बापू अथवा महाराज साक्षात देव असतात वा त्यांचे दूत असतात. यामुळे शोषणाचे मूळ सामाजिक आणि भौतिक परिस्थितीत शोधण्याऐवजी ते प्राक्तनात शोधले जाते. जीवनातील शोषण प्रारब्धाने होते या वृत्तीला खतपाणी घातले तर त्यापासून सुटका होण्यासाठी असा कोणी तरी हवा असतो जो प्रारब्ध समजू शकेल व बदलू शकेल. कर्मविपाकाच्या सिद्धांताने बुवाबाजीला ताकद मिळते. बुवाबाजीविरुद्ध लढण्यासाठी आणि लोकांची मानसिक गुलामगिरी संपविण्यासाठी कर्मसिद्धान्त व दैव या कल्पनेतील तर्कदुष्टता लोकांना सांगावयास हवी.
व्यक्तिगत कर्तृत्वाने समाजव्यवस्था बदलू अशी आशा बहुसंख्य जनसामान्यांना राहिलेली नाही. त्यासाठी त्यांना कोणी तरी स्वामी, महाराज, बापू, संत-महंत लागतो. प्रत्यक्षात ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेले असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमाहात्म्य वाढवणाऱ्या तंत्राची असते. बाबांच्या भक्ताचे विशिष्ट रंगाचे कपडे, विशिष्ट माळा, महाराजांचा फोटो असलेला बिल्ला, पेन, मंत्रजप या साऱ्यांतून एक प्रभावी वातावरणनिर्मिती होते. त्यात सुरुवातीला समाधान, सामथ्र्य जाणवते. मग नकळत सक्ती निर्माण होते. सर्व कारभारात एक प्रकारची गुप्तता असते. भक्त हा कडवा सैनिक बनेल व बुवाबाजी ही एक अभेद्य व्यूहरचना बनेल यासाठी सततचे ब्रेनवॉशिंग व कंडिशनिंग चालू राहते. भक्तांची चिकित्सक बुद्धी तहकूब होते वा केली जाते. याचबरोबर एका व्यापकतेचे भानही या लढाईत ठेवावे लागते. विज्ञानामुळे माणसाच्या हातात आलेला प्रकाशझोत परिस्थितीतून निर्माण झालेली अगतिकता दूर करू शकत नाही. समाजात उदंड भ्रष्टाचार, हिंसाचार, अपघात, वाढती व्यसनाधीनता, महागाई असे रोजचे जीवन अशक्य करणारे जीवघेणे प्रश्न आहेत. स्वत:च्या व्यक्तिगत कर्तृत्वाने वा समाजव्यवस्था संघर्षांने बदलून यामधून मार्ग काढता येईल अशी आशा बहुसंख्य जनसामान्यांना राहिलेली नाही. मग त्यासाठी त्यांना कोणी तरी स्वामी, महाराज, बापू, संतमहंत लागतो. दुसऱ्या बाजूला प्रसारमाध्यमे रोज जगण्याचे नवे चंगळवादी मानदंड मनावर लादत असतात. ते मिळवावयाचे तर भ्रष्टाचार करावयास हवा. त्यातून सहीसलामत सुटण्यासाठी आणि पापक्षालनासाठी मग लोक बाबाच्या मागे लागतात. त्याच्या सूचनेप्रमाणे उदी लावतात, अंगठी घालतात, मंत्र जपतात, बाबाच्या पुढे संपूर्ण शरणार्थी बनून आपले सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील, अशी आशा बाळगतात. खरे तर प्रश्न प्रामुख्याने जोडलेले असतात समाजाच्या जडणघडणीशी. ते सोडविण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात उतरावे लागते; परंतु त्यापेक्षा धार्मिक, सांस्कृतिक परंपरेतून आलेला आणि जणू थेट अलीबाबाच्या गुहेत घेऊन जाणारा बिनसंघर्षांचा मार्ग बहुसंख्यांच्या मानसिकतेला जवळचा व हवाहवासा वाटतो.[९]

No comments:

Post a Comment

Your Review Comment Here